Feed on
Posts
Comments

राख…!(गजल)

अता रात्र नाही गंधाळलेली..
उरी चंद्रकोरी कवटाळलेली..

तरीही बहर निशिगंधास येतो
नजर मात्र त्याची ओशाळलेली..

सखे शब्द होते कविता सहेली
अता फक्त पाने चुरगाळलेली..

पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..

जरा थांब मरणा सोबत तुझ्या घे
मला जिंदगीही कंटाळलेली..

किती जाळण्याची केलीत घाई
तरी राख मागे रेंगाळलेली…!

–   अभिजीत दाते

dipavali

दिवस येतात, दिवस जातात
सुखदु:खांची ओंजळ देउन हातात..

प्रकाश जीवनातला आटत जातो .
अंधार मात्र दाटत जातो .

पण कोपर्‍यात कुठेतरी
इवलासाच दिवा असतो .
त्याचा एक किरणसुद्धा
मग आपल्याला हवा असतो .

सत्कर्याचा असाच दिवा,
सद्भावाची अशीच पणती ,
जीवनमार्गावर धावत असता
तेवत राहो आपुल्या चित्ती..

पुन्हा घेऊ नवी भरारी ,
गत ते सारे तमासमान !
चला साजरी करू दिवाळी ,
सुरात गाउन प्रकाशगान..!

-    अभिजीत दाते

थांबले पाऊल आता..
गाठले राऊळ आता..

स्वप्न सारे सत्य झाले
मन परी व्याकूळ आता..

का स्वतःच्या वेदनेतच
राहतो मश्गुल आता..

वाळवंटी थेंब नाही
मृगजळाची भूल आता..

पेलवेना साहवेना
ही व्यथेची झूल आता..

आयता मी नाग होतो
सोडले वारूळ आता..

अन तुझ्या छायेत आलो
दे तुझी चाहूल आता..

लावितो थोडी कपाळी
पावलांची धूळ आता..

होऊ दे निर्माल्य चरणी
या तनूचे फ़ूल आता..!

–  अभिजीत दाते

मनाच्या डोहात खोल खोल तुझ्या आठवणी…
रानातून वाहता ओहोळ तुझ्या आठवणी…

फ़ेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…

स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…
मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…

तुझ्याइतक्याच हळव्या तुझ्या आठवणी…
राहून राहून छळव्या तुझ्या आठवणी…

करतात भावविव्हल तुझ्या आठवणी…
तरीही राहू देत जवळ तुझ्या आठवणी…

माझ्या प्रीतीचं इमान, तुझ्या आठवणी…
तू नाहीस… किमान तुझ्या आठवणी…!

–   अभिजीत दाते

तुझी पावलं उमटली होती
किनार्‍याच्या मऊ पांढर्‍या रेतीवर .
स्वप्नांचे महाल होते ,
शेजारी शेजारी कोरलेली दोन नावं ,
आणि स्वतःच रेखाटलेली मर्यादेची रेषा !
पण काळाच्या लाटेत सारंच वाहून गेलं..
पुसट होत गेले हळूहळू सगळेच ठसे
जणू नव्हतेच कधी तिथे ते तसे !
लाटेचा इलाज नव्हता ,
किनाराही हतबल होता .

आता बर्‍याच वर्षांनी तुझं भेटणं
पुन्हा त्याच किनार्‍याशी…
तशीच एक अवखळ लाट आली ,
यावेळी तिचा अवखळपणा थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय, नाही..!

बहुतेक किनार्‍यालाही उमगलंय ,
वाळूवर उमटलेल्या ठशांनाही कधीतरी जावंच लागतं .
लाटेला तिचं देणं द्यावंच लागतं .
शिकलाय आता तो पाहायला तटस्थपणे,
पावलांकडे आणि लाटांकडेही..!

की तूच शिकली आहेस चालणं अलगदपणे
किनार्‍यावर आपली पावले उमटू न देता…!

–    अभिजीत दाते

स्वप्न….

स्वप्न….

कधी नुसतंच रंजन असतं.
कधी काळजाचं स्पंदन असतं.
पण कसंही असलं तरी
ते जगण्याचं इंधन असतं..!

विचारांच्या जलधारेला
कल्पकतेचा स्पर्श जणू…
मनक्षितीजावर ये आकारा
स्वप्नांची इंद्रधनु..

इच्छा आकांक्षांच्या प्रवाहाला
स्वप्नं हक्काचा काठ देतात .
आणि मार्ग खुंटले म्हणजे
स्वप्नंच नवी वाट देतात .

काही स्वप्नं स्वप्नंच राहतात
तरी आयुष्यभर पुरतात .
पुढच्या पिढीसाठी मागे
वारसा म्हणुन उरतात .

कालचं स्वप्नं, आजचं वास्तव
आजचं स्वप्नं , उद्याचं सत्य
वास्तवाइतकंच म्हणून सांगतो
स्वप्नातसुद्धा आहे तथ्य..

कारण…

दिवस नसला आपला तरी
स्वप्नांनी रात्र आपली असते .
स्वप्न म्हणजे मनावरच्या
जखमेवरची खपली असते..!

–    अभिजीत दाते

शब्द भिजलेले तुझ्या अधराशी
बोल काही माझ्यासवे, थांब ना जराशी..!

खिडकीशी घुटमळे, मन सांजवारा
सळसळ पडद्याची कानी ये जराशी..!

निःशब्दाची लय वाहे जीवघेणी
ओलेती पापणी लवते डोळ्याशी..!

ओंजळीत तुझा शब्द शब्द घ्यावा
आणि निखळावा ताराही आकाशी..!

हात चांदण्याचे तुझे हाती यावे
हळुवार व्हावे स्पर्श मोरपिशी..!

त्या एका क्षणात आयुष्य सरावे
आणि जन्मा यावे पुन्हा तुझ्या देशी..!

थांब स्वप्न माझे सरू दे एवढे
सुरू होती पुढे दुनियेच्या वेशी..!

तिथे नियतीचा गुंतवेल धागा
खेळवेल दोघां जग दरवेशी..!

काय देऊ तुला, कवितेवाचून
तेच एक धन, आहे माझ्यापाशी..!

                    
                         –    अभिजीत  दाते

मैत्रीण

                माझ्या सर्व नव्या जुन्या मैत्रीणींसाठी…

123

                                                     

                                                   एक तरी मैत्रीण असावी
                                                   बाईकवर मागे बसावी
                                                   जुनी हीरो होंडा सुद्धा मग
                                                   करिझ्माहून झकास दिसावी !

                                                                    एक तरी मैत्रीण असावी
                                                                    चारचौघीत उठून दिसावी
                                                                    बोलली नाही तरी निदान
                                                                    समोर बघून गोड हसावी !

                                                   एक तरी मैत्रीण असावी
                                                   कधीतरी सोबत फिरावी
                                                   दोघांना एकत्र पाहून
                                                   गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

                                                                    एक तरी मैत्रीण असावी
                                                                    जिच्याशी निर्मळ संवाद असावा
                                                                    कधीतरी छोट्या भांडणाचा
                                                                    एखादाच अपवाद असावा..

                                                  एक तरी मैत्रीण असावी
                                                  आयुष्याच्या अनोळखी वळणावर
                                                  तुमच्या व्यथा वेदनांवर
                                                  तिने घालावी हळूच फुंकर..

                                                                  एक तरी मैत्रीण असावी
                                                                  जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
                                                                  तुमचासुद्धा खांदा कधी
                                                                  तिच्या दुःखाने भिजावा..

                                                 एक तरी मैत्रीण असावी
                                                 चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
                                                 मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
                                                 चालावं पुढे तिच्याच प्रकाशात..

                                                                          -     अभिजीत दाते

                     तुम्हालाही अशी एखादी मैत्रीण आवडेलच , नाही का  !

तू असतेस कधी कधीच ती कायमची उरी ;
खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..!

तू भेटणार अधून मधून , ती मात्र आहे मनात रुजून .
तुझी नेहमीच निघायची घाई , तिला जाणं माहितच नाही .

तू असशील जरूर रेखा ;पण ती जया भादुरी..
खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..!

तू फ़ेसाळत्या लाटेसारखी , ती किनारा असते .
तू निघून गेल्यावरती तीच सहारा असते .

तिच होते सखी माझी दाटून येता सरी..
खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..!

तू नसतेस तेव्हा असतं तिचंच राज्य मनावर .
तू भान हरपून टाकतेस , ती आणते भानावर !

ती शीतल चंदन , तू चांदण्याची सुरी..
खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..!

तू असशील गुलाब ; ती मोहक रातराणी .
तू हृदयाचे आलाप ; ती श्वासामधली गाणी .

तू कान्ह्याची राधा , ती स्वरमंजुळ बासरी..
खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..!

-  अभिजीत दाते

आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
आनंदाने भरून आलाय ऊर
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर…

आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!

आज १५ ऑगस्ट ना मित्रा…
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !

पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
“कौन बनेगा करोडपती” संपून
झालेत बरेच दिवस !

आज १५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका
उद्याच पडणार ठाऊक आहे
त्यांचा रंग फ़िका..!

आज १५ ऑगस्ट ना ,
मग म्हण “विविधतेत एकता”
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!

आज १५ ऑगस्ट ना ,
“मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.

आज १५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .

काळजी करू नकोस
असंच करत करत या देशाने गाठलीय साठी
छापील भाषण मात्र जपून ठेव
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!

-   अभिजीत दाते

तिला सांगून टाकीन म्हणतो , पण धाडस होतच नाही..!
मग मनात राहते सारे , तिजपर्यंत पोचत नाही..!

बेचैन एकटा भिजतो
अन तसाच ओला थिजतो
जागेपणी पाहतो स्वप्ने
स्वप्नात तेवढा निजतो
पण पहाट होण्याआधीच ते सरते थांबत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!

ती भेटीस जेव्हा येते
कायम घाईतच असते
मी हिरमुसला होताना
ती खळीदारशी हसते
पण प्रीती तरीही माझी तिजवरची आटत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!

मी करतो लाख बहाणे
पण करते दैव उताणे
कसले नशिबाचे फ़ासे
तोकडीच आमची दाने
ही कसली साडेसाती, ज्योतिषास उमगत नाही..!
मग मनात राहते सारे , तिजपर्यंत पोचत नाही..!

ती होईल कुण्या दुजाची
मग दैना आयुष्याची
या जन्माचे तर सोडा
अडचण साता जन्मांची
ती आठव्या जन्मीसुद्धा मज मिळेल वाटत नाही..!
मग मनात राहते सारे , तिजपर्यंत पोचत नाही..!

–   अभिजीत दाते

थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

–  अभिजीत दाते

  लागायाचा कसा कुणाला तुझ्या मनाचा थांग
  मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!

  नको बहाणे अजुन राणी
  सांग एकदा हळूच कानी
  चंद्र बहरला, फ़ुलून आली
  रात्र साजणी , दाही दिशांनी
  खुणावते तुजला काही नक्षत्रांची रांग..!
  मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!

  कुंद हवांनी धुंद किनारे
  नकळत अपुल्या जाणून सारे
  कळले बघ या रानफ़ुलांना
  कळले पण का तुला इशारे !
  प्रीतीच्या वाटेवर शब्दांचे तोरण बांध..!
  मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!

  निःशब्दातून जे उलगडते
  शब्दातून ते का ना घडते ?
  तुझ्या मनीही आहे जर ते
  ओठावर का येऊन अडते !
  स्पर्शात रोमांच तुझ्या अन नजरेतून आव्हान..!
  मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!

  –   अभिजीत दाते

पाऊस दाटून आल्यावर
मीही चातक बनून पाहतो..
आपल्या वाट्याला येणार्‍या
थेंबांचा हिशेब करून पाहतो..

पाऊस दाटून आल्यावर
आभाळ डोळे भरुन बघतो..
पाण्यात पुन्हा पाणी सामावताना
कोरड्या किनार्‍यावरून बघतो..

पाऊस दाटून आल्यावर
उघडून घेतो मनाची दारे..
आणि भरून घेतो श्वासात
नव्या ऋतुचे नवीन वारे..

पाऊस दाटून आल्यावर
तुझाही विसर पडतो थोडा वेळ..
गुंग होऊन बघत राहतो
बुडत्या तरत्या नावांचा खेळ..

पाऊस दाटून आल्यावर
आठवतातच ते ओले क्षण..
टपरीवरची चहा भजी
एकाच छत्रीत भिजलेले दोघे जण..

पाऊस दाटून आल्यावर
तनासोबत मनालाही भिजवून घेतो
थोडे माझे , थोडे तुझे
सगळेच वणवे विझवून घेतो..!

–   अभिजीत दाते

sudden-rain_jr29054.jpg   

      

        मे महिना सरत आलेला असतो , आसमंतातला उकाडा आता शिगेला पोचलेला असतो आणि त्याची चर्चा सुरु होते . तो कुठवर आलाय ? अजुन किती दिवस लागतील ? वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यांकडे डोळा लागलेला असतो . तसा कुठे कुठे तो आपली वर्दी देत असतोच . आणि एक दिवस “दक्षिण दिग्विजय” करुन जेत्याच्या थाटात तो दाखल होतो . उन्हाचे पहारे हा हा म्हणता उठतात आणि अनभिषिक्त राजाच्या दिमाखात त्याअची सद्दी सुरु होते .
        मी मान्सून बद्दल बोलतोय हे एव्हाना लक्षात आलं असेलच . उन्हाच्या काहिलीने मन सुनं सुनं झाल्यावर येतो तो मान्सून . अर्थात पाऊस . निसर्गचक्राचा सृजनशील आविष्कार . सुर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ़ होते . हलकी असल्याने ती वर वर जाते . या वाफ़ेचे ढग बनतात . हे ढग डोंगरांमुळे अडतात आणि थंडाव्यामुळे वाफ़ेचं पुन्हा पाण्यात रुपांतर होतं . हाच पाऊस असं आपण शाळेत घोकंपट्टी करत शिकलेलं असतं . पण या ऋतुचक्राला गदिमांसारखा सिद्धहस्त कवी  आपल्या प्रतिभेने एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो …

   नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर
  कशी शहाण्यांची मनं , नाही नदीला माहेर !
  काय सांगू बाप्पांनो, तुम्ह आंधळ्याचे चेले
  नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले .
  नदीचे सारे पाणि पोटी घेतो हा सागर
  पण तिला खुणावतो जन्म दिलेला  डोंगर           
  डोंगराच्या मायेसाठी रूप वाफ़ेचे घेऊन
  नदी उडत जाते पंख वार्‍याचे लेवून
  पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
  पान्हा फ़ुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा…! 

         
         अगदी पहिल्या सरीपासूनच हा पाऊस आपल्याला प्रेमात पाडतो . पहिल्या पावसानंतर येणार मृद्गंध… जणू प्रसवाला सज्ज झालेल्या धरित्रीचा हुंकार…!  टपोर्‍या थेंबांना पाहून कुणा युवतीच्या पायातील पैंजणांची आठवण व्हावी …
 दोन्ही आवाजात तेच माधुर्य आणि तेच अंगावर सुखद शिरशिरी आणणं …!

          पण शहरवासीयांसाठी पाऊस महत्त्वाचा असतो फ़क्त धरणातल्या पाणीसाठ्यासाठी किंवा एखाद्या वर्षा सहलीपुरता . तसा वागला की मग तो अगदी आज्ञाधारक ठरतो . पण त्याने जरासा खट्याळपणा सुरु केला की मग तारांबळ उडवून देतो . मग हीच मंडळी पावसाच्या नावाने बोटं मोडायला सुरुवात करतात . अशाच दोन विचारातला वाद कवी सौमित्र यांनी भांडणार्‍या प्रेमी युगुलाच्या निमित्तानं छानच टिपलाय…

                   पाऊस म्हणजे चिखल सारा , पाऊस म्हणजे मरगळ..
                   पाऊस म्हणजे गार वारा , पाऊस म्हणजे हिरवळ..

                   पाऊस कपडे खराब करतो , पाऊस वैतागवाडी..
                   पाऊस म्हणजे भिजरी पायवाट , पाऊस म्हणजे झाडी..

                   पाऊस रेंगाळलेली कामं , पाऊस म्हणजे सुट्टी उगाच..
                   पावसामध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसतं ढगात …
         प्रेमी युगुलांसाठी पाऊस म्हणजे पर्वणीच . एकाच छत्रीतून एकमेकांना सावरत , एकमेकांच्या नजरेत हरवत भिजत भिजत भटकण्याची लज्जत काही औरच…! अचानक वीज चमकते आणि ती घाबरुन अलगद त्याला बिलगते आणि तोही आपल्या स्पर्शाने तिला दिलासा देतो . किती रोमॅंटीक..! ” प्यार हुआ , इकरार हुआ ” किंवा “लगी आज सावन की फ़िर वो झडी है”  सारखी गाणी नकळत ओठावर येतात . मराठीत सुद्धा ” घन घन माला नभी दाटल्या , कोसळती धारा”  , “भेट तुझी माझी स्मरते”   किंवा “ऋतू हिरवा” सारखी श्रवणीय गाणी आहेतच . अशा कितीतरी गाण्यांतून , कवितांमधुन पाऊस आपल्याला चिंब भिजवत आला आहे .
          पण इथे भिजायला वेळ आहे कुणाला ! ऑफ़िसच्या एसीची सवय झालेल्या जीवाला थंडगार पावसाळी वारं सोसत नाही . सदानकदा इस्त्रीच्या कपड्यात वावरणारे आम्ही … आम्हाला त्यावर पावसाचे शिंतोडे उडालेले खपत नाहीत . दोन शिंका आल्या म्हणजे आम्ही डॉक्टरकडे धाव घेणार . आमच्या खिडकीच्या काचा बंद करून घेणार . ” घराने मला आज समजावले , भिजुनी घरी रोज परतायचे “  या ओळी आम्ही कधी अनुभवणारच नाही . मग पाऊस आम्हाला जीवाभावाचा वाटणारच कसा !  आणि आमच्या रूक्ष जीवनात नवी पालवी तरी कुठुन फ़ुटावी ! असंच कोरड्याने जगत राहणार की मोठेपणाची झूल बाजुला ठेवून दोन सरी झेलणार !

                 स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा
                 आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा…
                 दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी
                 नित्य नव्या उंबर्‍याशी वाढतो पाऊस हा…
                 वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी
                 अन् मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा…

         तो आपली इनिंग सुरु करेलच आता . बघा आपल्या खिडकीची काच थोडी उघडता आली तर…

         पहिल्या पावसाच्या तुम्हाला ओल्याचिंब शुभेच्छा…!
         ……     अभिजीत दाते

बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून..
नाहीतर तुला दिसले असते ओले डोळे दुरून..

बरं झालं जमलं नाही नजरेला नजर भिडवून पाहाणं..
कदाचित मलाच जमलं नसतं भानावरती राहाणं..

तुला उगाचंच वाटलं असतं मी दुबळा आहे..
मीही चारचौघांसारखाच गं , कुठे वेगळा आहे ?

तुझंही नव्हतं पूर्वीसारखं खळीदार मधाळ हसणं..
मध उरला नाहीच आता नुसतंच मधमाशांचं डसणं…

तसाही येणार नव्हताच कधी हातात हात तुझा…
जमिनीवरच्या दगडांवर मेहेरबान होतात का आकाशातल्या वीजा ?

पण तरीही बरं झालं एकदा भेटलीस , मनावरचं ओझं हलकं झालं .
आयुष्य माझ्याशी पुन्हा एकदा बोलकं झालं .

माझं मलाच कळून चुकलं आता चालणं एकाकी  आहे…
अर्धं आयुष्य वणव्यात गेलं , पण अजुन जळणं बाकी आहे…!

–   अभिजीत दाते

तुझ्यावर कविता लिहिणं हल्ली सोडून दिलंय मी…
पण शब्दच कधी कधी वेड्यासारखं वागतात ,
कवितेतलं त्यांचं हक्काचं घर मागतात..

तुझं गाणं गुणगुणणंही हल्ली सोडून दिलंय मी…
पण सुरच कधी कधी कधी नव्हे ते लागतात ,
मैफ़लीतलं त्यांचं हक्काचं घर मागतात..

तुझी वाट बघणंही हल्ली सोडून दिलंय मी…
पण डोळेच कधी कधी  वेड्यासारखं वागतात ,
तुझ्या वाटेकडे लागून रात्र रात्र जागतात..

तुझा विषय काढणंही हल्ली सोडून दिलंय मी…
पण आठवणीच कधी कधी वेड्यासारखं वागतात ,
कातरवेळी मनामधला लाव्हा ढवळून काढतात..

तसं एकटेपणाशी हल्ली जुळवून घेतलंय मी…
पण अश्रूच कधी कधी वेड्यासारखं वागतात ,
त्यांचं हक्काचं घर सोडून माझ्या सोबतीला धावतात…!

–   अभिजीत दाते

1857

      १० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्‍या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .
      केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्‍यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्‍या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . “पुराणातली वांगी पुराणात” तद्वत “इतिहासातली वांगी इतिहासात” असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .
     या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…
     या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,

             “वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
             दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”

    आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची  शोकांतिका..!

“जय हिंद”

 –         अभिजीत दाते
   
  
   

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी .
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

सांगायाचे आज तिला मी रोज ठरवतो ,
पण ती येता समोर मजला घामच फ़ुटतो .
ओठावरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिचे बोलणे फ़क्त वाटते ऐकत राहावे .
तिने हासता तिच्या गालची खळीच व्हावे .
तिने आणि तिनेच यावे माझ्या स्वप्नातुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

कधी वाटते असतील आमुची जिवलग नाती ,
कधी भासते कुणी दूरची अनोळखी ती .
उगाच मजला छळण्याची की खोड तिची ही जुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिलाही कळते सारे मजला ठाऊक आहे
खात्री नाही तरीही आशा अंधुक आहे
भाव मनीचे आज ना उद्या घेईल ती समजुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

-   अभिजीत दाते

« Newer Posts - Older Posts »