Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

बेत

आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे.
आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे.

भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का
मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे.

अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला
ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे.

टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी
देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे.

एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे.

रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे.

– अभिजीत दाते

स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…
मी विचारतो आरशातल्या प्रतिबिंबालाच माझा परिचय.

आरसाही म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं..अनेक वर्षांपूर्वी.
पण आता कसलातरी थर चढल्यासारखा वाटतोय चेहर्‍यावर…

मी खरवडून काढू पाहतो पुन्हा पुन्हा चेहर्‍यावरचा संधीसाधूपणाचा मुखवटा, स्वार्थाची पुटं,
आणि उगाचच होतो रक्तबंबाळ..!

मग आरसा हसून म्हणतो,
“तू स्वतःलाच बघत आलास माझ्यात वर्षानुवर्ष, बुडून राहिलास आपल्याच कैफ़ात..

आता चेहरा खरवडणं जमत नसेल तर निदान माझ्या अंगावरचा वर्ख तरी खरवडून टाक.

मग मीही होईन पारदर्शी,
माझ्यातून आरपार जग दिसेल तुला,

आणि त्या जगातल्याच कुणाच्यातरी डोळ्यात तुला दिसेल तुझा खराखुरा चेहरा..!”

 –  अभिजीत दाते

मायबोली गझल कार्यशाळा – २ मध्ये लिहिलेली ही गझल.. 

ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत सचेतन सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही

–  अभिजीत दाते

कैफात चूक झाली, डोळे भरून आले.
“सैतान” ती म्हणाली, डोळे भरून आले.

टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरून आले.

निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले.

वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा.
मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले.

तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले.

– अभिजीत दाते

(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून)

एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले.
जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले.

मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला.
आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले.

एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा,
तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले.

वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा.
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.

लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.

भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली.
राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले.

– अभिजीत दाते

मूळ गीत – मेघ नसता वीज नसता
कवी – संदिप खरे

gudiगुढीपाडवा आणि नववर्षानिमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

या पाडव्याला ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण होतायत. वाचणार्‍यांचा उमेद वाढवणारा प्रतिसाद आणि स्वच्छंदी लेखनात मिळणारा निखळ आनंद यामुळे माझ्या आरंभशूरतेला हा ब्लॉग अपवाद ठरला असं म्हणावं लागेल. हे श्रेय आणि जितकं अधुनमधुन डोकं वर काढणार्‍या लेखकाचं, तितकंच वाचकांचंही.

अशीच या ब्लॉगची वाटचाल चालू राहो इतकीच सरस्वतीचरणी प्रार्थना..!

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका… :)

फैसला

तुझ्या हृदयातल्या कोर्टात माझा फैसला होता.
पुरेशी साक्षही होती; पुरावा चांगला होता.

कसा पाऊसही आला पुढे धावून मदतीला.
कदचित आसवांमधल्या मिठाला जागला होता.

तुझ्या जुलमावरी त्यांना पुरेशा वाटल्या शंका.
कुणी जखमांवरी माझ्या भरवसा ठेवला होता ?

कशाला जामिनाच्या अन बचावाच्या करु वार्ता
तुझ्यावाचून जगण्याचा कुठे मज हौसला होता.

कुणावर आळ घेऊ अन कुणाला आळवू आता ?
तुझ्यावर जीव “तो” सुद्धा जडवुनी बैसला होता.

–  अभिजीत दाते

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

बरेच काही..!

आठवशिल तर आठवेलसे बरेच काही
अजुनी आहे राहिले तसे बरेच काही

मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला,
ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही

क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला.
निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही

तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो
घडले आहे जागवेलसे बरेच काही

जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही

आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!

– अभिजीत दाते

जत्रा..!

अविनाश ओगले यांच्या “जत्रा” या सुंदर गझलेचं हे विडंबन.

 

(”वधूवर मेळावा” नावाच्या जत्रेला)
उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा.
दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा.

नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.

झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे.
चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा.

वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर,
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा.

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा.
स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ?

–  अभिजीत दाते

(अबू सालेम तुरुंगात त्याच्या साथीदाराला ऐकवतो)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही..!

कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही..!

मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,
कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही..!

कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी.
कसे बाँबस्फ़ोटही घडवायचा दाऊदही..!

कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची,
जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही..!

आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!

– अभिजीत दाते

मूळ गीत -  तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
कवी           -  संदीप खरे

(संदीप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांनी आणि एसींनी क्षमा करावी)

बापू…

तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू.
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता
व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता
पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..!

तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे.
तुमची नावे घेऊन राडे करती सारे.
नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले.
अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले.
मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते.
क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते.
कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ?
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

प्राणही गेला तरी अता बेहत्तर बापू.
आम्हीच आता शोधू आमचे उत्तर बापू..!

–    अभिजीत दाते

वर्ख..!

दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे.
करतात मग कशाला भलताच तर्क येथे..!

लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले.
अर्थाशिवाय नसतो कुठलाच “अर्थ” येथे..!

निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले.
छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे..!

फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात “सर्प” येथे..!

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच “वर्ख” येथे..!

 

–   अभिजीत दाते

(विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने..)

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

राजा वदला कशी बिनसली “न्युक्लिअर डील” ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या “पंज्याच्या” रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१

तिला विचारी राजा, खासदार कसे फोडावे ?
का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ?
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२

राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
अन राजाला लगेच पटली “मायाजाल” निशाणी..! ..३

त्या राणीने मिटळे डोळे “क्रॉस व्होटिंग” होताना.
त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना.
विरोधकांच्या मुखात उरली “सिंग इज किंग” विराणी..! ..४

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

–  अभिजीत दाते

पाउस..!

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..!
छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..!

मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला.
तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..!

कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला.
मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..!

अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली.
रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..!

कधी सरीतून निघता जखमांवरची खपली.
स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..!

तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला.
कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..!

–   अभिजीत दाते


आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
त्या दिवशी झेंडा बाण्यात असतो .
देशभक्तीच्या गाण्यात असतो .
दुस-या दिवशी तोच कुठेतरी गटारातल्या पाण्यात असतो .
एका दिवसाची देशभक्ती तत्त्व आमचं ठरलं आहे ..
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..

अहिंसेचा ध्वज आम्ही मोठ्या डौलाने सांभाळतो .
पण शिवाजी, राणा प्रताप, राणी लक्ष्मीला का गुंडाळतो ?
अर्जुनाचं मन आमचं गीता मात्र विसरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..

भगतसिंग इतकाच आमचा अशफ़ाकलाही सलाम असतो .
आमच्या देशाचा पहिला नागरिक कुणी अब्दुल कलाम असतो .
विद्वेषाचं विष तरीही आमच्या मनात भरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..

आमच्या बुद्धीला, ज्ञानाला सा-या जगात मान आहे .
पण सरस्वती आमची लक्ष्मीकडे गहाण आहे .
पिझ्झा,बर्गर,कोला,पेप्सी आमच्या नसांत शिरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..

प्रेम बंधुभाव सारं जरूर तुमच्या मनात ठेवा .
पण सीमेवरती पृथ्‍वी आणि अग्नी तैनात ठेवा .
देवानेही एका हातात पद्म दुस-या हातात शस्त्र धरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..

आता तरी वज्रमूठ वळू दे…
भारतवर्ष पुन्हा उजळू दे…
उठा नव्याने जगाला कळू दे…

आज फ़ळे जी तुम्ही चाखता बीज आम्हीच पेरलं आहे ..!

-  अभिजीत दाते

तुझ्या गळा, माझ्या गळा,
सीबीआय चौकशीच्या माळा.

दाद मागायची कोणाला ?
चला रे आता कोर्टात चला.

तुज “पोटा”, मज “मोक्का”.
आणखी “टाडा” कोणाला?
लाज वाटते का तुम्हाला ?
मला कुणाची, देशाला.

तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.

तुज झटका, मज फटका.
आणखी अटका कोणाला ?
सांगू कुठल्या नेत्याला.
सांग तिकडच्या “भाई”ला.

तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.

आसू आसू डोळ्यात आसू.
वरवर खोटे हसू हसू.
मंत्रीपदी आता नको बसू.
सरकार आमचे तसू तसू.

तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.

कशी कशी आज अशी.
चंगळ आली अंगाशी.
आता गट्टी फू तुमच्याशी.
तर मग “युती” कोणाशी ?

–  अभिजीत दाते

मूळ गीत – तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

शेतकरी चढतो फासावर नको काळजी !
आपणास मिळते ना भाकर, नको काळजी !

पेढ्या, बँका बुडती येथे, बुडेनात का.
स्विस बॅकेतुन ठेवा लॉकर, नको काळजी !

पाच सनांनी भरेल येथे खुर्चिस्वयंवर,
बिज्वर तरिही ठराल उपवर, नको काळजी !

पचतो आहे तोवर पैसा खात रहावे.
होऊन झाले काय आजवर, नको काळजी !

याने केला दावा, त्याने केस ठोकली,
न्यायनिवाडा नाही सत्वर, नको काळजी !

शिमगा येथे रोजच पेटत असते होळी.
पोळी घ्यावी भाजून त्यावर, नको काळजी !

भावभावना अश्रू मुबलक ग्लिसरिनयोगे,
संधीपुरता यावा गहिवर, नको काळजी !

प्रहार खोटा यांचा, त्यांचे रडणे खोटे.
एक तमाशा सारे संगर, नको काळजी !

गुणवत्तेहून जेथे ठरते संख्या मोठी,
पाचच ते अन आम्ही शंभर, नको काळजी !

– अभिजीत दाते

एक तारा पेटुनी उठला पुरे..!
वीतभर काळोख विस्कटला पुरे..!

घोषणा, आंदोलने पुढचे पुढे,
भाषणाला येऊनी बसला पुरे..!

कायद्याचा खेळ आम्ही पाहिला
न्याय नाही लाभला; खटला पुरे..!

दर्शनांती देव नाही भेटला
राहिल्या शाबूत या “चपला” पुरे..!

वाहवा त्याला हवी तितकी मिळो.
दाद “एसेमेस”ची मजला पुरे..!

मी स्वतःचे रक्त का सांडू असे ?
हा जरासा हात खरचटला, पुरे..!

देव, देशास्तव समाजास्तव नको
तो स्वतःसाठी जरी लढला पुरे..!

जीवनाचा अर्थ कोणाला हवा ?
शेवटी आरंभ उलगडला, पुरे..!

– अभिजीत दाते

Older Posts »