Feed on
Posts
Comments

कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.

पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.

दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले.

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.

चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..!

– अभिजीत दाते

बरं झालं असतं “ओएसओ” जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळतात.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळतात.
जग सुनं सुनं होतं पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू.
आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू.
“दि एन्ड” नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता,
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

– अभिजीत दाते

 नूतन वर्षाभिनंदन..!

gudhi

नमस्कार,

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!

गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..!  सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्‍या, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक नवीन पोस्ट टाकताना उत्साह आणि तुमच्या प्रतिक्रियांबद्दलचं कुतुहल अशा संमिश्र भावना मनात पिंगा घालत राहिल्या आणि पुढेही घालत राहतील. या निमित्ताने बर्‍याच नवीन ओळखी झाल्या. त्यांचे मार्गदर्शन आणि सुचनावजा प्रोत्साहन या भांडवलावरच या ब्लॉअची वाटचाल पुढे चालू राहिली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जोवर हे असं मातृभाषाप्रेम शाबूत आहे तोवर मराठीला नामशेष होण्याची भीती नाही.

असंच बर्‍यापैकी लिखाण पुढेही माझ्या हातून घडो आणि तुमच्या सूचना, प्रतिक्रिया अशाच मिळत राहोत हीच सरस्वतीच्या चरणी प्रार्थना..!

जाता जाता एवढंच म्हणेन की…

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत

mumbai local

जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर.
स्लो लोकलची वाट पहाणे नामंजूर.
मी मिळवावी जागा विंडोशेजारची,
दुसरी, तिसरी, चौथी जागा नामंजूर..!

कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको.
सुट्ट्या पैशाचाही मजला त्रास नको.
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!

विदाऊट तिकिट जातो पाहून लाईन मी.
टि.सी. धरता मजला भरतो फ़ाईन मी.
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!

धक्के, बुक्के भांडण तंटे लाख कळा,
लेडीज चढता डब्यात होतो घोटाळा.
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी,
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!

“मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही.”

विरार, पनवेल,खोपोली ती दूर बरी.
बोरिवली, वाशी, कल्याणची गोष्ट खरी.
सेंट्रल,हार्बर शिव्या घालणे मज समजे,
पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर..!
–   अभिजीत दाते  (मूळ कविता — “संदिप खरे”)

सोडुनी द्या मामला हा सेट नाही.
मी तिच्या नजरेत तितका ग्रेट नाही.

वाट बघणे नेहमीचे काम होते
तीच उशिरा, मी कधीही लेट नाही.

ती म्हणाली जाऊ जोधा अकबराला.
पाहिला मी अजुन “जब वी मेट” नाही.

बॅंक बॅलन्स काय आहे काय सांगू,
दुसरा कुणी कवितेविना असेट नाही.

ती परी सुद्धा अता “इतिहास” झाली
खिन्न मी थोडा परी अपसेट नाही.

आडनावातून डी, ए, टी, ई तरिहि,
का मला स्वप्नात सुद्धा डेट नाही ?

–   अभिजीत दाते 

तिला भिजायची हौस…
मला भिजायची हौस..
त्याला भिजवायची हौस..!

खूप जमतो रंग जेव्हा भेटतात…

ती, मी आणि पाऊस…!

Tee, Mee aani Paaus

गारवा…

कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा..

हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..

लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..

पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?

रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..

गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!

–    अभिजीत दाते

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.

गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.

गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.

कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला.

मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा
म्हटलं, “मग सोडा युपी दिन, “जय महाराष्ट्र” म्हणा..!”

–    अभिजीत दाते

बाकी आहे…!

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे.
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे.

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे.
माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे.

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा,
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.

नैवेद्याचा केला त्यांनी गाजावाजा,
तेच जेवले; देव उपाशी बाकी आहे.

हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली.
अता मागणे काय नभाशी बाकी आहे ?

नको भास्करा किरणांसाठी तुझी मुजोरी,
दीप येथला स्वयंप्रकाशी बाकी आहे..!

–   अभिजीत दाते

ठरवून असं एका दिवसात प्रेम होतं का सुरु ?
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

प्रेम असं कागदाच्या तुकड्यावर का मांडतात ?
प्रेम अगं सुगंधासारखं दाही दिशात सांडतात.
स्वच्छंद पाखरासारखं दोघं आभाळभर फिरु..
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

कोण म्हणतं या एकाच दिवशी प्रेम होतं व्यक्त ?
पापण्यांच्या पडद्याआड मग दुसरं काय दिसतं ?
सय आली की नकळत कसे डोळे लागतात झरु..
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

आपल्या आजाने केला होता का व्हॅलेंटाईन साजरा?
बाबानं दिला असेल आईला चाफ़्याचाच गजरा
जुनंच अगं अस्सल सोनं त्याचीच वाट धरु ..!
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

बाजीराव मस्तानीचे धागे व्हॅलेंटाईन शिवायच जुळले ना..
नल-दमयंती, दुष्यंत-शकुंतला एकमेकांचे झाले ना..
राधा कृष्णासारखे जगावेगळे प्रेमी ठरु..!
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

–    अभिजीत दाते

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी…
विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी…

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन…
आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन…

माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर
व्याकरण शुद्धलेखनाच्या निघतात चुका शंभर…

माझ्या प्रेमपत्रांवरती तिच्या आजीची पाळत…
आठवणीने त्यावर गच्चीत घालते पापड वाळत…

माझ्या प्रेमपत्रांमधल्या सुंदर ओळी ढापून,
तिची बहिण मासिकामधून आणते कविता छापून…

माझ्या प्रेमपत्रांसोबत शेवटी तिच्या भावाच्या खोड्या..
पाऊस साचल्या डबक्यामध्ये रोज गुलाबी होड्या..

माझी प्रेमपत्रं तीही वाचते केव्हातरी…
पत्ता बदलतो आणि जातात माझ्याच मित्राच्या घरी…!

–   अभिजीत दाते

तुझ्या घरावर कोसळणारा पाऊस माझ्याशी असं का वागतो ?
नुसतं बरसून जाण्यासाठी सुद्धा आसवांची व्हिजिटिंग फ़ी मागतो…

तुझ्या दाराशी रेंगाळणारा वारा माझ्याशी असं का वागतो ?
तुझ्या केसातला मोगराच त्याला नेहमी का लागतो ?

तुझ्या अंगणातला चंद्र माझ्याशी असं का वागतो ?
चांदण्याने जग न्हाताना माझ्या अंगणात काळोख दाटतो .

तुझ्या ओसरीवरचा कंदील तेवढा माझ्याशी ईमान राखतो .
रात संपेपर्यंत मी आणि वात संपेपर्यंत तो जागतो …

-    अभिजीत दाते

कितीसा…!

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..

साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..

सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
“अभिजित” वेगळा मग ठरणार मी कितीसा..!

-   अभिजीत दाते

बंद होते..

बरसणे येथे घनांचे बंद होते .
पावसाळे आसवांचे बंद होते .

मी जिथे गेलो फुले वेचावयाला,
उमलणे तेथे कळ्यांचे बंद होते .

धूर का आश्वासनांचा आज नाही ?
कारखाने भाषणांचे बंद होते .

घातला हैदोस होता दानवांनी
नेत्र भोळ्या शंकराचे बंद होते .

तू नको दैवास आता दोष देऊ ,
ओठ त्यावेळी कुणाचे बंद होते ?

दाटले होते जरी डोळ्यात पाणी
दार माझ्या पापण्यांचे बंद होते .

मोडुनी पडल्या किती मानात माना ,
वाकणे त्यांच्या कण्याचे बंद होते .

आज यांच्या “वागण्याने” संप आहे ,
काल त्यांच्या “मागण्यांचे” बंद होते..!

–   अभिजीत दाते

कोकीळ का न गाई ?
केली कुणी मनाई..

सरला वसंत आणिक
उध्वस्त आमराई..

गोपाळ काल होते
झाले अता कसाई.

पापास भय कशाचे ?
पुण्याहुनी सवाई..

भावास भाव नाही
परकाच येथ “भाई”..

दारूत धुंद पोरे ,
अश्रूत चिंब आई .

आकाश हे तुझ्या की
डोळ्यातली निळाई!

निवडुंग राहिलो मी
अन तू फुलून जाई..

युद्धे नकोत आम्हा
जगणे इथे लढाई.

दिधला दुवा जगाने
“अभिजीत” ही कमाई..!

–    अभिजीत दाते

maajhya manavar

राख…!

अता रात्र नाही गंधाळलेली..
उरी चंद्रकोरी कवटाळलेली..

तरीही बहर निशिगंधास येतो
नजर मात्र त्याची ओशाळलेली..

सखे शब्द होते कविता सहेली
अता फक्त पाने चुरगाळलेली..

पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..

जरा थांब मरणा सोबत तुझ्या घे
मला जिंदगीही कंटाळलेली..

किती जाळण्याची केलीत घाई
तरी राख मागे रेंगाळलेली…!

–   अभिजीत दाते

dipavali

दिवस येतात, दिवस जातात
सुखदु:खांची ओंजळ देउन हातात..

प्रकाश जीवनातला आटत जातो .
अंधार मात्र दाटत जातो .

पण कोपर्‍यात कुठेतरी
इवलासाच दिवा असतो .
त्याचा एक किरणसुद्धा
मग आपल्याला हवा असतो .

सत्कर्याचा असाच दिवा,
सद्भावाची अशीच पणती ,
जीवनमार्गावर धावत असता
तेवत राहो आपुल्या चित्ती..

पुन्हा घेऊ नवी भरारी ,
गत ते सारे तमासमान !
चला साजरी करू दिवाळी ,
सुरात गाउन प्रकाशगान..!

-    अभिजीत दाते

देवळात…

थांबले पाऊल आता..
गाठले राऊळ आता..

स्वप्न सारे सत्य झाले
मन परी व्याकूळ आता..

का स्वतःच्या वेदनेतच
राहतो मश्गुल आता..

वाळवंटी थेंब नाही
मृगजळाची भूल आता..

पेलवेना साहवेना
ही व्यथेची झूल आता..

आयता मी नाग होतो
सोडले वारूळ आता..

अन तुझ्या छायेत आलो
दे तुझी चाहूल आता..

लावितो थोडी कपाळी
पावलांची धूळ आता..

होऊ दे निर्माल्य चरणी
या तनूचे फ़ूल आता..!

–  अभिजीत दाते

मनाच्या डोहात खोल खोल तुझ्या आठवणी…
रानातून वाहता ओहोळ तुझ्या आठवणी…

फ़ेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…

स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…
मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…

तुझ्याइतक्याच हळव्या तुझ्या आठवणी…
राहून राहून छळव्या तुझ्या आठवणी…

करतात भावविव्हल तुझ्या आठवणी…
तरीही राहू देत जवळ तुझ्या आठवणी…

माझ्या प्रीतीचं इमान, तुझ्या आठवणी…
तू नाहीस… किमान तुझ्या आठवणी…!

–   अभिजीत दाते

Older Posts »